महिला दिनी ‘राजा येईल गं’ या चित्रपटाची घोषणा : रुचिरा जाधवची प्रमुख भूमिका
कोल्हापूर : कथा आहे स्त्रीजन्माची… एका आईची… दोन मैत्रीणींची… स्त्रीने सोसलेल्या दु:खाची… तिच्या प्रेरणादायी संघर्षाची… नाट्यमय वळणं असलेली ‘राजा येईल गं’ ही एकीकडे नात्यांची गोष्ट सांगणार आहे, तर दुसरीकडे समाजातील ज्वलंत मुद्द्यांवरही प्रकाश टाकणार आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘राजा येईल गं’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.परिपूर्ण मनोरंजन करणारा हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत एक अनमोल संदेशही पोहोचवणार आहे.
कॅरीसमा २४ सिने या बॅनरखाली ‘राजा येईल गं’ या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून थ्री डॅाट्स स्टुडिओजचे आनंद तांबोळी, नेहा टकले, खिंजल फिल्म्सचे चंद्र मोहन दीक्षित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक धुरा रविसुमन हे आहेत. या चित्रपटाबाबत रविसुमन म्हणाले की, या चित्रपटातील व्यक्तिरेखांमध्ये प्रेक्षकांना विविध छटा दिसतील. चित्रपट पाहताना कुठे ना कुठे त्यांना आपलं प्रतिबिंब पडद्यावर पाहायला मिळेल. एक सुरेख गोष्टीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण संदेशही जनमानसापर्यंत पोहोचवणार आहे.
‘राजा येईल गं’ या चित्रपटात रुचिरा जाधव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबत कोणकोणते कलाकार दिसणार हे लवकरच समजणार आहे. मूळ कथा नेहा टकले यांची पटकथा व संवादलेखन रविसुमन यांनीच केले आहे. निलेश गमरे यांच्या साथीने गीतलेखन केलं असून, ही गीते संगीतकार विशाल बोरुळकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. प्रग्नेश दवे व निलेश गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
