शिरोलीत पतीने पत्नीला डोक्यात हातोडीचे घाव घालून केले गंभीर जखमी
शिरोली : पुलाची शिरोली ता. हातकणंगले येथील कोरगावकर कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री घडली. तर पतीने सीपीआर रूग्णालयातून पळ काढला व बावडा मार्गे येऊन पंचगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे येत आहे.
याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सागर गोपाळ कोळवणकर ( वय ३५ ) हा शिरोलीतील कोरगावकर कॉलनी येथे एका भाड्याच्या घरात पत्नी मनीषा आणि दोन मुलासह राहत होता. एमआयडीसी येथे एका कंपनीत नोकरीस होता. गेले दोन दिवस त्याची पत्नी मनीषा हिचे आई-वडील आणि भाऊ नाना लक्ष्मण मोहिते हे त्याच्याकडे राहायला आले होते. काल मध्यरात्री अचानक सागर याने आपली पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडीचे घाव घातले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मनीषाही किंचाळत उठली. त्यामुळे घरातील सगळे जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला. त्याची मुले दरवाजा उघडून बाहेर आली. शेजारील नागरिकांनी सागर याला पकडून ठेवले आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवले. ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून जखमी मनीषाला कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सागरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक न करता 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मागवून घेऊन त्यालाही सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठवले. पण सागर हा पहाटेपर्यंत सीपीआर हॉस्पिटलमध्ये थांबला आणि तेथून तो पळून गेला. मनीषा हिचा भाऊ नाना लक्ष्मण मोहिते वय 29 राहणार हॉटेल सोनाली, डेक्कन मिलच्या समोर, इचलकरंजी याने दिलेल्या फिर्यादिनुसार पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केल्याबद्दल शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सागर गोपाळ कोळवणकर याच्यावर गुन्हा दाखल झाला.
सागर हा सीपीआर मधून बाहेर पडून बावडा मार्गे शिये पंचगंगा नदीच्या पुलावर आला आणि त्याने नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पहिल्याचे समजते. त्यामुळे सागर याने आत्महत्या केली असावी असाही संशय व्यक्त होत आहे. सागर हा हल्लेखोर संशयित आरोपी असल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी प्रत्यक्ष सागरला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेऊन मग सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करणे आवश्यक होते. पण पोलीस नातेवाईक आणि इतर लोकांना रुग्णवाहिकेबरोबर पाठवून परस्पर पोलीस ठाण्यात निघून गेले. त्यामुळेच सागर सीपीआरमधून निघून गेला. अशीही चर्चा होत आहे.
