औद्योगिक वसाहतीतील चोऱ्या, लूटमार, अवैध व्यवसाय रोखावे : औद्योगिक संघटनांची मागणी
कोल्हापूर : सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये पेट्रोलिंग वाढवणे, सुरक्षेच्या दृष्टीने सीसी टीव्ही बसविणे, स्क्रॅप गोळा करणार्या महिला टोळीवर कार्यवाही, अवैध धंदे बंद करणे, चोरी व लूटमार प्रकार घडू नयेत याकरिता योग्य त्या उपाय योजना करणे, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी करिता लागणारा स्टाफ उपलब्ध करून देणे, एन. एच. फोर नॅशनल हायवे, लक्ष्मी टेकडी येथे ट्राफीक पोलीस नियुक्ती करणे, अतिक्रमण काढणे करिता पोलिस बंदोबस्त मिळणे बाबत अडचणी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे मांडल्या.
उद्योजकांच्या पोलिस प्रशासनाशी निगडीत असणार्या विविध समस्या जाणून घेण्याकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी अलंकार हॉल येथे विशेष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीअंती विविध असोसिएशन्स व उद्योजकांनी मांडलेले प्रश्न पोलीस प्रशासनाकडून सोडवले जातील. तीन महिन्यातून एकदा आय जी, जिल्हा पोलीस प्रमुख व त्या त्या औद्योगिक क्षेत्रातील ठाणेदार यांचे बरोबर एकत्रित बैठक आयोजित केली जाईल अशी ग्वाही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडीत, कोल्हापूर शहर डीवायएसपी अजित टिके, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा रवींद्र कळमकर आदी उपस्थित होते.
सुनील फुलारी म्हणाले उद्योजक त्यांच्या उद्योग क्षेत्रात खूप लोकांना वेगवेगळे नवीन रोजगार देतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य मिळते.
स्मॅक चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी पोलीस प्रशासनाचे उद्योजकांना नेहमी सहकार्य मिळत असल्याचे नमूद करून सुनिल फुलारी यांच्या सत्कार केला.
औद्योगिक असोसिएशन्सच्या वतीने सुरेन्द्र जैन, नितीनचंद्र दळवाई, हरिश्चंद्र धोत्रे, संजय पेंडसे यांनी अडचणी मांडल्या.
बैठकीस शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई,
मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल- हातकलंगले मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, संचालक संजय पेंडसे, स्मॅकचे संचालक सचिन पाटील, रणजीत जाधव, निमंत्रित सदस्य पांडुरंग बुधले, उद्योजक चंद्रशेखर डोली, भीमराव खाडे, अजिंक्य तळेकर, सुनिल माणगावे, अनिल जाधव, संगमेश पाटील, सत्यजित सावंत, रामचंद्र लोहार, बाबासो कांबळे आदी उपस्थित होते.
