महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न
कोल्हापूर : विज्ञान शाप की वरदान हे त्याच्या योग्य वापरावर अवलंबून आहे. विज्ञान व तंत्रज्ञान उपयोगी आहे, पण त्याचा अतिरेकी वापर उदाहरणार्थ मोबाईल व त्यातील गेम्स चा अतिरेकी वापर घातक असल्याचे व भावी पिढी सुसंस्कृत करण्याच्या दृष्टीने त्यावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज असल्याचे मत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
ते एमआयडीसीच्या ६२ व्या वर्धापनदिन व स्नेह मेळावा निमित्त हॉटेल पॅव्हेलियन मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते..
एका वागळे इस्टेट या क्षेत्रापासून सन १९६२ साली सुरु झालेली एमआयडीसी आज राज्यात २८९ औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत व आशिया खंडातील सर्वात मोठे पाणीपुरवठा वितरण जाळे निर्माण केले असल्याचे त्यांनी नमूद केले
याप्रसंगी बोलताना कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक यांनी उद्योजक हा केंद्रबिंदू मानून दर्जेदार सुविधा आणि त्यांच्या अडचणींना सोडविण्यास सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्रास धडाडीचे उद्योग मंत्री लाभल्याने पायाभूत सुविधांची बरीच कामे करता आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचे उद्योजकांचे समन्वयाचे आणि त्यांच्या विकासासह महाराष्ट्राची ही उद्योगशील प्रतिमा अधिक व्यापक करण्यासाठी एमआयडीसी कार्यरत असून ६२ व्या वर्षात पदार्पण करताना अधिकाधिक प्रभावीपणे नवनवीन योजनांचं कार्य करण्याचा निर्धार करत आहे.
प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे यांनी नवीन भूसंपादन करून उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील असल्याच्या भावना व्यक्त केल्या. आगामी काळातील नेमकी गरज लक्षात घेऊन सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे मुंबईला जोडणारा उद्योग झोन विकसित करण्यात येत असल्याचेही माहिती त्यांनी दिली. राज्य शासनाच्या विविध उद्योगासाठी उद्योजकांपर्यंत पोचवण्यास एमआयडीसी ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे.असे ते म्हणाले .
कार्यक्रमास स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले, गोशिमा चे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई, उपाध्यक्ष स्वरूप कदम, मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, कोषाध्यक्ष सुरेश शिरसागर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे ऑ. सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनियरिंग क्लस्टर चे अध्यक्ष दीपक चोरगे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे व औद्योगिक संघटनांचे संचालक, निमंत्रण सदस्य, उद्योजक उपस्थित होते.
यावेळी स्पर्धा व शालेय परीक्षेत यश मिळवलेले विधार्थी तसेच विविध उद्योग व्यवसायात यशस्वी झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमआयडीसीचे उप अभियंता अजयकुमार रानगे यांनी केले तर आभार उप अभियंता कागल सुनिल अपराज यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश कुरणे यांनी केले. कार्यक्रमास कोल्हापुर विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
