कोल्हापूरातील अजब रॅलीत , लग्नासाठी मुलगी, स्वस्त मटण, फुकट पेट्रोलची मागणी
कोल्हापूर : जमाना बदलतो तशा समाजातील समस्याही बदलतात. जुन्या रूढी परंपरा झुगारून आधुनिकतेची कास धरून परिवर्तन घडवण्याची शिकवण कोल्हापूरकरांना राजर्षी शाहू महाराजांनी दिली आहे. सध्या मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे, पेट्रोल पासून कोल्हापूरकरांना प्रिय असलेल्या मटणाची महागाई, हवा, पाण्याचे प्रदूषण, पर्यावरणाची हानी, व्यायामाच्या आभावामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी अशा सामाजिक समस्याच्या जनजागृतीसाठी कोल्हापूरात आज अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीची जिल्ह्यात चर्चा रंगलीच पण सोशल मिडियावरही ही रॅली चांगलीच व्हायरल झाली.
लग्न करण्यासाठी मुलगी द्या, मटण स्वस्त करा, कोल्हापुरात समुद्र पाहिजे अशा अजब-गजब मागण्या करीत ही कोल्हापुरात सायकल रॅली काढण्यात आली.
कोल्हापुरातील खासबाग मैदानाजवळील प्रिन्स क्लबच्या सदस्यांनी या सायकल रॅलीचं आयोजन केलं . पंचगंगा नदीचा संगम असलेल्या करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या गावापर्यंत रॅली काढून समाजाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पंचगंगा नदीच्या संगमावरती अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावत सायकलचं पूजन करून रॅलीची सुरुवात कली. एकीकडं मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश, मात्र सर्वांच्या फायद्याचाच होता, यात नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळलं पाहिजे, आपलं आरोग्यसुद्धा जपलं पाहिजे, असा संदेश देण्यात आला.
लग्नासाठी मुलाचं कर्तृत्व चांगलं असंल तरी, मुलींमध्ये मुलाच्या मालमत्तेकडं पाहण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, मुलींनी मालमत्तेकडं न पहाता मुलाचं कर्तृत्व पाहावं, तो व्यसनाधीन नसावा, त्याची वागणूक चांगली असायला हवी, अशा बाबी बघायला हव्यात. केंद्रासह राज्य सरकारनं अनेक खात्यांचं खाजगीकरण केलंय, त्यामुळं सरकारी नोकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे, निदान आता तरी लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नोकरीचा हट्ट सोडावा, अशी मागणी विवाहित मुलांनीही केली आहे.
या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांवर लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे, मटण स्वस्त झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालंच पाहिजे अशा अनेक मजेदार मागण्या करण्यात आल्या आहेत.
